Saturday, April 9, 2011

मी पाहिलेल्या सरस्वतीचा प्रवाह


ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर जसा बांध घालणे अवघड आहे तसेच लोकशक्तीच्या जनक्षोभाला आवर घालणे, ट्युनिशिया च्या सीडी बौझीद शहरा पासून सुरु झालेले रीवोलूषण चे लोन जेव्हा चीन पर्यंत पोहोचले तेव्हा भारतामधल्या राजनैतीकांना सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण जनक्षोभाची हि गंगा तेव्हा भारतामधून तर गेलेली होतीच, पण सरस्वतीच्या प्रवाहाप्रमाणे ती अदृश्य झाली होती, म्हणजे अस्तित्व तर आहे पण अदृश्य स्वरुपात, आणि हीच सरस्वती मग अन्ना हजारेंच्या रूपातून दिल्ली मध्ये अवतरली, तेव्हा या राजनैतिकांची पळता भुई झाली आणि अखेर ८ एप्रिल रोजी या महाभागांना या सरस्वती च्या प्रवाह समोर नतमस्तक व्हावेच लागले. 
७२ वर्षीय अन्ना यांच्या राळेगणसिद्धी  गावाला मी शाळेत असताना भेट दिलेली होती. अहमदनगर जिल्ह्यामधील हे गाव, जेव्हा कधी पुण्यावरून औरंगाबाद ला बस जाते तेव्हा रस्त्या मध्ये शनी शिंगणापूरची कमान दिसते तशीच या अण्णांच्या गावाची  पण, आणि न जाणतेपणाने काही जन हि कमान दिसली कि हात हृदया जवळ नेऊन त्यांना सलाम करतात.
"मान्य आहे भारत हि वाढती आर्थिक बाजारपेठ आहे आणि उभरती आर्थिक महासत्ता, पण या महासत्तेचा जर साधारण खेड्या पाड्यांनाच "अर्थ" उमगला नाही तर या महासत्तेचा काय उपयोग? "
एकीकडे भारताच्या विकासाचा बाऊ करायचा, भारताच्या तरुण पिढीचे कौतुक करून त्यांना झाडावर नेऊन चढवायचे, आणि दुसरीकडे आपला शेतकरी सोयी सुविधांसाठी तरसत असताना, त्यांना बाहुल्या सारखे खेळवत राहावायचे. आपला खरा भारतीय राहतो तो या लहान खेड्यांमध्ये. भारताचा किती हि विकास झाला तरी आपण आजही पूर्णतः या खेड्यांवरच अवलंबून आहोत, कारण ७०% शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अन्न धान्याचा पुरवठा होतो तो या गावातूनच आणि या गावांचा विकासच खोळंबला तर आपणाला ज्या पायाभूत सुविधा मिळतात त्याला खंड पडेल. "देशाचा विकास घडवायचा असेन तर आधी या गावांपर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत असायला हवेत. एवढे काम जरी या राजनैतिकांनी नीट पार पाडले तरी पुष्कळ आहे". पहिल्या महायुद्ध मध्ये उध्वस्त झालेल्या जर्मनीला विकसित करण्यासाठी हिटलर ने सुरुवात केली होती ती या कामापासूनच, आधी सर्व रस्ते व्यवस्थित करून घेतले तेव्हाच कुठे जर्मनीची आश्चर्यकारक प्रगती ५-६ वर्षात झाली. या सर्व गोष्टी काय "या" लोकांना कळत नाही का?
           आणखीन एक म्हणजे, एकदा आपण यांना निवडून दिल्यावर  वाऱ्यावर सोडून  दिल्या  सारखे  विसरून  जातो. जशा शाळेमध्ये ३ माही, ६ माही परीक्षा होतात, तशाच योग्यवेळी  या लोकांची परीक्षा व्हावी अथवा अशी काही तरी तरतूद  असावी कायद्या मध्ये.  हे लोक का विसरतात कि आपल्याला याच नागरिकांनी निवडून दिलेले आहोत, आपण या लोकांचे प्रतिनिधी आहोत.(कदाचित "विसरतो" अशी संज्ञा देणे हा आपला भोळेपणा, हो ना ?)  पण मोहापुढे कोणाचे काय चालणार, या मोहापायी हे लोक तर स्वतःच्या देशाची इभ्रत देखील लुटायला बसलेले असतात. मग जेव्हा कधी अशा लोकांची संख्या वाढते तेव्हा मग ती सरस्वती अशा लोकप्रवाहाच्या रूपाने प्रवाहित होते, आणि आपले अस्तित्व सांगून जाते. आपल्या इतिहासा मध्ये अशा अस्तित्वाचे अनेक दाखले आहेत, मग ते संत एकनाथ असो अथवा लोकमान्य किंवा राणी लक्ष्मिबाई. आश्चर्य आहेना , तुम्हाला वाटत असेन आपलाच पैसा हे लोक घेतात आणि आपल्याला नकळत त्याच्या दुरुपयोग करतात आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो. आपल्या पैकी किती जन त्या माहिती अधिकाराच्या कायद्याचा (http://rti.gov.in/) उपयोग करतात हे तो देवच जाने.  
  असो सध्या दिल्ली मध्ये जे काही सुरु आहे भ्रष्टाचार विरोधात ते खरच भारताच्या लोकशाहीची दृष्ट काढावी असे आहे. आता खूप लोकांना प्रश्न पडला असेन कि सध्या या आंदोलना मध्ये अण्णांनी हा अदृश्य प्रवाह जागृत करण्यासाठी पुढाकार घेतला, पुढे काय? इथे मला उर्जा अक्षय्यतेच नियम अनिरुद्धांकित  करायला फार आवडेन. हा प्रवाह काही ठिकाणी अदृश्य असतो तर काही ठिकाणी जागृत, योग्य वेळेस योग्य ठिकाणी गरज असते ती याला जागृत करण्याची, आणि अशा योग्य वेळेस हि उर्जा रुपांतरीत होते आणि आपला प्रभाव दाखवून जाते. तो "मार्गदर्शक" तेव्हा या प्रवाहाला योग्य ती दिशा देतो, मग या प्रवाहाच्या आड जे पण काही येते त्यांना हा प्रवाह जुमानत नाही, आणि मग काय होते हे तर आपण सद्य परिस्थिती मध्ये बघतच आहोत. जसे बाकीचे प्रवाह शेवटच्या क्षणाला समुद्राला जावून मिळतात, तसा हा प्रवाह नाही, हा प्रवाह जिकडे उतार (म्हणजे सद्य परिस्थिती)  आहे त्या दिशेला वाहत जातो आणि शेवटी "त्या" मार्गदर्शकाला जावून मिळतो.
- अभिजित जोशी